Category: ग्राऊंड रिपोर्ट

  • पिंपळे गुरवमध्ये आरक्षित जागा धूळखात; पार्किंगच्या प्रश्नाने नागरिक हैराण!

    पवना नदीच्या काठी वसलेले आणि गेल्या काही दशकांत झपाट्याने नागरीकरण झालेले प्रभाग क्रमांक ३१ (पिंपळे गुरव – नवी सांगवी) सध्या विकासाच्या कागदी घोड्यांत अडकले आहे. रोजगार आणि शिक्षणाच्या निमित्ताने बाहेरून येऊन स्थायिक झालेल्यांची संख्या मोठी असली, तरी मूलभूत सुविधांच्या बाबतीत हा प्रभाग आजही संघर्षाच्या उंबरठ्यावर आहे.

    १} ग्राउंड रिअॅलिटी: ‘कागदावर ओके, प्रत्यक्षात मात्र अपूर्ण!’

    ‘पॉलिटिकल वझीर’च्या ग्राऊंड रिपोर्टनुसार, या प्रभागात प्रशासकीय अनास्था स्पष्टपणे दिसून येते:

    रस्त्यांची दुरवस्था: कृष्णा चौक ते एम. के. चौक या मुख्य रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. सध्या रस्त्यावर केवळ डांबराचे ठिगळ लावून वेळ मारून नेली जात आहे, ज्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय.

    पार्किंगची डोकेदुखी: राजीव गांधीनगर, कृष्णा चौक, एम. एस. काटे चौक आणि काटेपूरम चौक अशा प्रमुख ठिकाणी पार्किंगची गंभीर समस्या आहे. गल्लीबोळातील रस्ते अरुंद असल्याने वाहतूक कोंडी पाचवीला पुजलेली आहे.

    पाणी आणि स्वच्छता: नवी सांगवी परिसरात पाणीपुरवठा अनियमित आणि कमी दाबाने होतो. झोपडपट्टी बहुल भागात ड्रेनेज लाईनची नियमित साफसफाई होत नसल्याने सांडपाणी साचून दुर्गंधी पसरत आहे.

    २} प्रभाग ३१: सविस्तर विश्लेषण:-

    बलस्थाने:– शिक्षण आणि सोयी: प्रभागात अनेक नामांकित खासगी शाळा आहेत. महत्त्वाची कनेक्टिव्हिटी: सांगवी फाटा उड्डाणपूल आणि पवना नदीकाठचा परिसर यामुळे प्रवासाची सोय.

    संधी:- सुसज्ज व्यायामशाळा: आधुनिक बंदिस्त व्यायामशाळा उभारून तरुणाईला आकर्षित करण्याची संधी.

    स्पर्धा परीक्षा केंद्र: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेची सोय करणे आवश्यक.

    धोके:- पाणी बिल गोंधळ: पाणी मीटर दुरुस्ती वेळेवर होत नाही, मात्र बिल वेळेवर येते, ज्यामुळे रहिवाशांमध्ये रोष आहे.

    भटकी जनावरे: परिसरात मोकाट कुत्री आणि जनावरांचा वावर वाढल्याने नागरिक भयभीत आहेत.

    ३} मतदारांची आकडेवारी :-

    एकूण मतदार: ४८,६२०
    पुरुष मतदार: २५,०७३ | महिला मतदार: २३,५४५
    आरक्षण: ३१ ‘अ’ (अ.जा. महिला), ३१ ‘ब’ (ओबीसी), ३१ ‘क’ (सर्वसाधारण महिला), ३१ ‘ड’ (सर्वसाधारण खुला)

    ४} जनतेचा आवाज: पॉलिटिकल वझीरशी संवाद :-

    किशन फसके (पिंपळे गुरव): उड्डाणपुलामुळे वाहतूक सुरळीत झाली, पण मैदान आणि उद्याने विकसित न झाल्याने विकास अपूर्ण वाटतो.

    राधिका दीक्षित (नवी सांगवी): पाणीपुरवठा अनियमित आहे, कचरागाड्या वेळेवर येत नाहीत, प्रशासनाचे याकडे अजिबात लक्ष नाही.

    प्रशांत रिकाने (नवी सांगवी): दिवसाआड पाणी येते, त्यामुळे कामगार आणि गृहिणींना मोठी कसरत करावी लागते.

    पॉलिटिकल वझीरच्या सूचना:-

    प्रभाग ३१ मधील निवडणूक यावेळी केवळ ‘जाती-पाती’च्या गणितावर नाही, तर रखडलेल्या विकासकामांच्या जाब विचारण्यावर असेल. येथील सुशिक्षित मतदारांना आता कागदोपत्री ‘ओके’ असलेला विकास नको, तर जमिनीवर दिसणारा बदल हवा आहे, पिंपळे गुरव आणि सांगवीचा खरा नेता तोच ठरेल जो ‘आरक्षित जागांवरील उद्याने’ विकसित करेल आणि ‘पार्किंगच्या चक्रव्यूहातून’ रहिवाशांची मुक्तता करेल. यंदा ‘बंद ड्रेनेज’ आणि ‘वेळेवर येणाऱ्या पाणी बिलांपेक्षा वेळेवर येणाऱ्या पाण्याची’ मागणी निवडणुकीचा निकाल ठरवेल!


  • प्रभाग २९: पिंपळे गुरवमध्ये ‘विकासगंगा’ अवतरली; पण गावठाणातील समस्यांना अजूनही ठेंगाच!

    पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरव हा भाग पिंपळे सौदागर आणि नवी सांगवीसारख्या विकसित परिसरांच्या मध्यभागी आहे. बाहेरील भागात उद्याने आणि प्रशस्त रस्ते दिसत असले तरी, मूळ गावठाण आणि अंतर्गत वस्त्यांमधील नागरिक आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. वाढत्या नागरीकरणामुळे येथील यंत्रणेवर प्रचंड ताण येत असल्याचे चित्र आहे.

    १. पॉलिटिकल वझीरच्या मते मतदारांची आकडेवारी:-

    एकूण मतदार: ५१,८५०.
    स्त्री-पुरुष प्रमाण: २६,५५९ पुरुष आणि २५,२८६ महिला मतदार.
    प्रभागाचे आरक्षण: २९-अ (अनुसूचित जाती महिला), २९-ब (अनुसूचित जमाती महिला), २९-क (नागरिकांचा मागास प्रवर्ग – ओबीसी) आणि २९-ड (सर्वसाधारण खुला गट).

    २. प्रभागातील प्रमुख भाग:-

    या प्रभागात पिंपळे गुरव गावठाण, लक्ष्मीनगर, भालेकरनगर , तुळजाभवानी नगर,अभंग कॉलनी,वैदू वस्ती, मोरया पार्क, सुदर्शन नगर, शिवनेरी कॉलनी, जवळकरनगर आणि कल्पतरू इस्टेट यांसारख्या भागांचा समावेश होतो.

    ३. ग्राऊंड रिपोर्ट: “चकचकीत रस्त्यांच्या मागे लपलेल्या व्यथा”

    पॉलिटिकल वझीरच्या रिपोर्टनुसार, पिंपळे गुरवमधील नागरिकांना खालील प्रमुख समस्यांचा सामना करावा लागत आहे:

    अनियमित पाणीपुरवठा: अनेक भागांत पाणीपुरवठा विस्कळीत असून, पिण्याचे शुद्ध पाणी मिळवण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे.

    वाहतूक कोंडी आणि अतिक्रमण: सुदर्शन नगर आणि सृष्टी चौक परिसरात वाहतुकीचे नियोजन कोलमडले आहे. ६० फुटी रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले आहे.

    भाजी मंडईचा अभाव: परिसरात स्वतंत्र आणि अधिकृत भाजी मंडई नसल्याने विक्रेते रस्त्यावर बसतात, ज्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो.

    अस्वच्छता: उघड्यावर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असून आरोग्याचा प्रश्न गंभीर होत आहे. मोलाचा पाडा आणि सुदर्शन नगरमधील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.

    ४. विकासाचा आढावा प्रभाग २९:-

    मार्गी लागलेली कामे

    • राजमाता जिजाऊ उद्यानाचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण.
    • स्मशानभूमीचे नूतनीकरण आणि स्पर्धा परीक्षा केंद्राची उभारणी.
    • नदी पत्राच्या कडेने आकर्षक घाट आणि जॉगिंग ट्रॅकचे काम पूर्ण.

    रखडलेली कामे

    • ‘पीएमपीएल’ बसस्थानकाचे रखडलेले नूतनीकरण.
    • स्वतंत्र भाजी मंडईची उभारणी अद्याप कागदावरच.
    • अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यात आलेले अपयश.

    ५. विश्लेषण प्रभाग २९:-

    बळ:- विकसित उद्याने, जॉगिंग ट्रॅक आणि आधुनिक शहरी पायाभूत सुविधा.
    उणिवा:- अनियमित पाणीपुरवठा आणि अंतर्गत वस्त्यांमधील अरुंद रस्ते.
    संधी: – वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ‘सृष्टी चौका’चे नियोजन केल्यास मतदारांचा मोठा पाठिंबा मिळू शकतो.
    धोका:- वाढती अतिक्रमणे आणि अस्वच्छतेमुळे परिसराच्या ‘स्मार्ट’ प्रतिमेला धक्का पोहचत आहे.

    पॉलिटिकल वझीरची सूचना :-

    पिंपळे गुरवमध्ये विजय मिळवण्यासाठी केवळ मोठ्या उद्यानांचे मार्केटिंग करून चालणार नाही. जो उमेदवार ‘गावठाणातील पाणी प्रश्न’ आणि ‘रस्त्यांवरील अतिक्रमण’ हटवून शिस्त लावेल, त्यालाच सजग मतदार आपला कौल देतील.

  • सर्वाधिक कर देऊनही वाकडकरांच्या पदरी ‘अपुरे पाणी’; प्रभाग २६ मध्ये स्मार्ट सिटीचा केवळ दिखावा?

    पिंपरी-चिंचवडमधील सर्वात वेगाने विकसित होणारा आणि हिंजवडी आयटी हबच्या कुशीत वसलेला प्रभाग क्रमांक २६ सध्या एका मोठ्या विरोधाभासाचा सामना करत आहे. आलिशान इमारती आणि आयटी प्रोफेशनल्सची वस्ती असलेल्या या प्रभागातून महापालिकेला सर्वाधिक कर मिळतो, मात्र मूलभूत सुविधांच्या बाबतीत येथील नागरिक आजही ‘दुय्यम’ वागणूक मिळत असल्याची भावना व्यक्त करत आहेत.

    1] ग्राउंड रिअॅलिटी: ‘टँकर’च्या दावणीला बांधलेला विकास!

    ‘पॉलिटिकल वझीर’च्या ग्राऊंड रिपोर्टनुसार, या प्रभागातील काही प्रश्न इतके जुने झाले आहेत की ते आता येथील रहिवाशांच्या जगण्याचा भाग बनले आहेत:

    पाणीबाणी: वाकड आणि पिंपळे निलखमधील अनेक सोसायट्यांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागते. “आम्ही महापालिकेला भरमसाठ कर भरतो, मग पिण्यासाठी पाणी विकत का घ्यावे?” असा संतप्त सवाल रहिवासी विचारत आहेत.


    वाहतुकीचा चक्रव्यूह: मुंबई-बेंगळुरू महामार्गाला लागून असल्याने येथे रोजची वाहतूक कोंडी पाचवीला पुजलेली आहे. पार्किंगसाठी नियोजित जागा नसल्याने रस्त्यांच्या दुतर्फा होणारी बेशिस्त पार्किंग ही मोठी समस्या आहे.


    फेरीवाल्यांचा विळखा: वाकड चौकापासून ते अंतर्गत रस्त्यांपर्यंत अनधिकृत फेरीवाल्यांनी पदपथ काबीज केले आहेत, ज्यामुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले आहे.


    कचरा आणि दुर्गंधी: सोसायट्यांतून कचरा उचलण्याचे नियोजन कोलमडल्याने आणि कचरा डेपोच्या समस्येमुळे नागरिक हैराण आहेत.

    2] प्रभाग २६: सविस्तर विश्लेषण:-

    बलस्थाने :- आर्थिक केंद्र: महापालिकेला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारा प्रभाग

    शिक्षण आणि आयटी: नामांकित शाळा, महाविद्यालये आणि आयटी पार्कची जवळीक.

    उणिवा:- पाणी टंचाई: उन्हाळ्यात टँकरमाफियांचे वर्चस्व आणि कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा

    सांस्कृतिक भवनाचा अभाव: महापालिकेचे एकही स्वतःचे सांस्कृतिक भवन या भागात नाही.

    संधी:- स्मार्ट पार्किंग: पार्किंगच्या जागा विकसित करून वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढणे शक्य

    अर्बन स्ट्रीट मॉडेल
    : अंतर्गत रस्त्यांचे ‘अर्बन स्ट्रीट’मध्ये रूपांतर करून नागरिकांना फिरण्यासाठी चांगले पदपथ देणे.

    धोके:- अनियोजित नागरीकरण: वाढत्या बांधकामांमुळे पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण येऊन भविष्यात गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

    आरोग्य आणि वीज: अनियमित वीजपुरवठा आणि कचऱ्यामुळे पसरणारे आजार हा मोठा धोका आहे.

    3] मतदारांची आकडेवारी :-

    एकूण मतदार: ६५,४८८
    पुरुष: ३४,८१७ | महिला: ३०,६६६
    आरक्षण: २६ ‘अ’ (अ.जा. राखीव), २६ ‘ब’ (ओबीसी महिला), २६ ‘क’ (सर्वसाधारण महिला), २६ ‘ड’ (सर्वसाधारण खुला)

    4] जनतेचा आवाज:

    • अंतर्गत रस्ते खराब झाले आहेत आणि पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते, ही स्मार्ट सिटीची कोणती लक्षणे आहेत?
    • पार्किंगचे नियोजन नाही, रस्त्यावर होणाऱ्या आठवडे बाजारामुळे प्रचंड त्रास होतो.
    • अर्धवट रस्ते पूर्ण होणे गरजेचे आहे, बेशिस्त पार्किंगमुळे अपघात वाढले आहेत.

    ‘पॉलिटिकल वझीर’चा धारदार निष्कर्ष:

    प्रभाग २६ मधील मतदार हा सुशिक्षित, कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारा आणि स्वतःच्या हक्कांबाबत जागरूक आहे. येथील जनता आता केवळ रस्ते आणि उड्डाणपुला’वर समाधानी नाही, या प्रभागाचा प्रतिनिधी तोच ठरेल जो वाकडमधील टँकर राज संपवून थेट नळाद्वारे पुरेसे पाणी देईल आणि वाहतूक कोंडी मुक्त थेरगाव-वाकड कनेक्टिव्हिटी देईल. यंदा प्रभाग २६ मध्ये ‘टॅक्स’च्या बदल्यात सर्विसेस मागणारा मतदार निवडणुकीचा निकाल ठरवेल.

  • प्रभाग २४: थेरगाव-डांगे चौकात विकासाचा झगमगाट; पण ड्रेनेज आणि ट्रॅफिकच्या ‘छोट्या’ समस्यांनी केला तोटा!

    पिंपरी-चिंचवडमधील प्रभाग २४ हा १९८६ मध्ये महापालिकेत समाविष्ट झाला. डांगे चौक आणि आदित्य बिर्ला हॉस्पिटलसारखी महत्त्वाची ठिकाणे या प्रभागात येतात. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून ड्रेनेज चोकअप आणि पदपथांवरील अतिक्रमणांसारख्या साध्या वाटणाऱ्या समस्या सुटत नसल्याने येथील नागरिक हवालदिल झाले आहेत.

    १. पॉलिटिकल वझीरच्या मते मतदारांची आकडेवारी:-

    एकूण मतदार: ४०,५९६

    मतदार विभागणी: २१,५०५ पुरुष आणि १९,०८७ महिला मतदार
    प्रभागाचे आरक्षण: २४-अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग), २४-ब (सर्वसाधारण महिला), २४-क (सर्वसाधारण महिला) आणि २४-ड (सर्वसाधारण).

    २. या प्रभागामधील प्रमुख भाग:-

    या प्रभागात आदित्य बिर्ला रुग्णालय, दत्तनगर,पद्मजी पेपरमिल, गंगा ओशियन गणेशनगर,मिडोज,क्रांतिवीर नगर, तुळजाई कॉलनी, कान्हयाया पार्क, सोळा नंबर, बेलठिका नगर, जय मल्हार नगर, महाराष्ट्र कॉलनी, यशदा कॉलनी, गुजरनगर, लक्ष्मण नगर, डांगे चौक मंगलनगर यांसारख्या दाट लोकवस्तीच्या भागांचा समावेश होतो.

    ३. ग्राऊंड रिपोर्ट: “समस्या सुटण्याची गरज”

    पॉलिटिकल वझीरच्या रिपोर्टनुसार, या प्रभागातील काही गंभीर प्रश्न खालीलप्रमाणे आहेत:

    ड्रेनेजचा विळखा: महाराष्ट्र कॉलनी आणि यशदा कॉलनी परिसरात ड्रेनेज चोकअपची समस्या वर्षानुवर्षे तशीच आहे, ज्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो.

    डांगे चौकातील डोकेदुखी: डांगे चौकात होणारी प्रचंड वाहतूक कोंडी, खासगी ट्रॅव्हल्सचे अनधिकृत थांबे आणि पदपथांवरील अतिक्रमणे यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे.

    केजुदेवी धरणाचे प्रदूषण: केजुदेवी बंधारा परिसरात पवना नदीचे प्रदूषण आणि परिसरातील अस्वच्छता हा चिंतेचा विषय बनला आहे.

    सुरक्षेचा अभाव: डांगे चौकात दिवसाढवळ्या चालणारे जुगार अड्डे आणि रात्रीच्या वेळी उघड्यावर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या टोळ्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत.

    ४. विकासाचा आढावा: प्रभाग २४

    मार्गी लागलेली कामे:-

    • डांगे चौक आणि लक्ष्मण नगर उद्यानांचे सुशोभीकरण.
    • बहुतांश अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण.
    • शिवसृष्टी आणि केजुदेवी बोटक्लब उद्यानाचा विकास.

    रखडलेली कामे:-

    • डांगे चौकातील आठवडे बाजार आणि वाहतुकीचे नियोजन.
    • जुन्या ड्रेनेज वाहिन्या बदलून मोठी वाहिनी टाकण्याचे काम.
    • सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव आणि पदपथ रुंदीकरण.

    ५. विश्लेषण: प्रभाग २४

    बळ:- विकसित व्यावसायिक केंद्र आणि आदित्य बिर्ला रुग्णालयासारखी मोठी आरोग्य सुविधा

    उणिवा:- ड्रेनेजची जुनी यंत्रणा आणि पदपथांवरील प्रचंड अतिक्रमणे

    संधी:- डांगे चौकातील वाहतूक कोंडी फोडल्यास आणि ड्रेनेजचा प्रश्न कायमचा सोडवल्यास मतदारांचा मोठा पाठिंबा मिळू शकतो

    धोका:- गुन्हेगारीचे वाढते प्रमाण आणि नदी प्रदूषणाकडे होणारे दुर्लक्ष आरोग्यासाठी घातक ठरू शकते

    पॉलिटिकल वझीरच्या सूचना:-

    प्रभाग २४ मध्ये विजय मिळवण्यासाठी मोठ्या घोषणांपेक्षा ड्रेनेज चोकअप आणि ट्रॅफिक या दोन मूलभूत प्रश्नांवर काम करणे गरजेचे आहे. जो उमेदवार ‘डांगे चौकातील अतिक्रमणे’ हटवून शिस्त लावेल, थेरगावची जनता त्यालाच आपला लोकप्रतिनिधी म्हणून निवडेल.

  • प्रभाग २३ मध्ये पवना नदीची ‘गटारगंगा’ आणि मालकी हक्काचा तिढा; कधी सुटणार थेरगावचा प्रश्न?

    पिंपरी-चिंचवडमधील एक महत्त्वाचे गावठाण म्हणून ओळखला जाणारा प्रभाग २३ सध्या विकासाच्या नव्या वळणावर उभा आहे. उच्चभ्रू सोसायट्या आणि दाट लोकवस्तीचा हा संमिश्र प्रभाग असला, तरी येथील नागरिकांचे प्रश्न आजही सुटलेले नाहीत.

    १] ग्राउंड रिअॅलिटी:

    ‘पाणी’ आणि ‘नदी’ या दोन प्रमुख आघाड्यांवर संताप!

    ‘पॉलिटिकल वझीर’च्या पाहणीनुसार, प्रभागात काही गंभीर नागरी समस्या मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत:

    पवना नदीचे प्रदूषण: थेरगाव गावठाण परिसरातून वाहणाऱ्या पवना नदीत थेट मैलामिश्रित सांडपाणी सोडले जात आहे. यामुळे नदीची अवस्था ‘गटारगंगे’सारखी झाली असून, परिसरात डासांचा प्रादुर्भाव आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.

    मालकी हक्कपत्रांचा तिढा: सुमारे ५ हजारहून अधिक मिळकतींना प्राधिकरणाच्या मालकी हक्कपत्रांचे  वाटप अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. यामुळे घरांची विक्री करणे किंवा नवीन बांधकाम परवानगी मिळवण्यात रहिवाशांना मोठ्या अडचणी येत आहेत.
    
    घसा कोरडाच: थेरगाव आणि दत्त नगर परिसरात पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने होतो. "रोज पाणी मिळावे" ही येथील नागरिकांची साधी पण महत्त्वाची मागणी आहे.
    
    बसेसची कमतरता: वाढती लोकसंख्या पाहता पीएमपीएल बसेसची संख्या अत्यंत कमी असून, नागरिकांना प्रवासासाठी ताटकळत उभे राहावे लागते.

    २] प्रभाग २३: सविस्तरचे विश्लेषणचे :-

    बलस्थाने:- पायाभूत सुविधा: थेरगाव-चिंचवड जोडणारा बटरफ्लाय पूल आणि अंतर्गत सिमेंट रस्त्यांचे जाळे.

    विकासकामे
    : थेरगाव स्मशानभूमीत गॅसदाहिनी आणि बापूजी उद्यानाचे सुशोभीकरण पूर्ण.

    उणिवा:-अस्वच्छता: रस्त्यांवर आणि मोकळ्या मैदानात पसरलेले कचऱ्याचे साम्राज्य

    नियोजन शून्य आरोग्य: थेरगाव नवीन रुग्णालयात पुरेशी साधनसामग्री आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव.

    संधी:- नदी पुनरुज्जीवन: पवना नदी स्वच्छ करून तिथे पर्यटन केंद्र किंवा रिव्हरफ्रंट विकसित करण्याची मोठी संधी आहे.

    मिळकत प्रश्न: जर मालकी हक्कपत्रांचा प्रश्न सुटला, तर तो कोणत्याही पक्षासाठी गेम चेंजर ठरेल.

    धोके:- दफनभूमीचा प्रश्न: मुस्लिम समाजासाठी हक्काच्या दफनभूमीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने नाराजी आहे.

    अतिक्रमणे: पदपथांवरील व्यावसायिक अतिक्रमणामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका.

    ३] मतदारांची आकडेवारी :-

    एकूण मतदार: ३३,०३३
    
    पुरुष: १७,६५७ | महिला: १५,३७३
    
    आरक्षण: ३२ 'अ' (अ.जा. महिला), ३२ 'ब' (ओबीसी), ३२ 'क' (खुला महिला), ३२ 'ड' (खुला गट)

    ४] जनतेचा आवाज:-

    • राजश्री शिरवळकर (रहिवासी):- मिळकत पत्राचा प्रश्न मार्गी लावून अंतर्गत ड्रेनेज लाईन सुधारायला हव्यात.
    • गणेश जगताप (रहिवासी):- नदीत मिसळणारे सांडपाणी तातडीने थांबवा, दुर्गंधीमुळे जगणे कठीण झाले आहे.
    • नानासाहेब गवळी (रहिवासी):- पाणी रोज आणि वेळेवर मिळणे ही आमची माफक अपेक्षा आहे.

    पॉलिटिकल वझीर’चा निष्कर्ष:-

    प्रभाग २३ मधील मतदार यावेळी केवळ रस्त्यांच्या चकचकाटावर भुलणार नाहीत. येथील राजकारण आता ‘गावकी-भावकी’ पलीकडे जाऊन मालकी हक्क आणि पर्यावरण (नदी स्वच्छता) या दोन मुद्द्यांवर स्थिरावले आहे. थेरगावचा खरा नेता तोच ठरेल जो पवना नदीला गटारगंगेतून मुक्त करण्याचे धाडस दाखवेल आणि हजारो कुटुंबांच्या घरांवर त्यांच्या मालकीचा शिक्का (हक्कपत्र) मिळवून देईल.

  • प्रभाग २२: काळेवाडीत आरक्षित जागांच्या विकासाला ‘खो’; मूलभूत सुविधांसाठी नागरिक आजही अनवाणी!

    पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत समावेश होऊन बराच काळ लोटला तरी, प्रभाग २२ मधील अनेक भाग आजही विकास प्रक्रियेपासून लांब राहिले आहेत. विशेषतः काळेवाडी आणि लगतच्या परिसरात आरक्षित जागांचा विकास रखडल्यामुळे खेळाची मैदाने, भाजी मंडई आणि रुग्णालयांसारख्या अत्यावश्यक सोयींसाठी नागरिकांना कसरत करावी लागत आहे.

    १. पॉलिटिकल वझीरच्या मते मतदारांची आकडेवारी:-

    एकूण मतदार: ५२,६९९.

    स्त्री-पुरुष प्रमाण: २७,७९३ पुरुष आणि २४,९०४ महिला मतदार.

    प्रभागाचे आरक्षण: २२-अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), २२-ब (सर्वसाधारण महिला), २२-क (सर्वसाधारण) आणि २२-ड (सर्वसाधारण)

    २. ‘बॅटल ग्राऊंड’ मधील प्रमुख भाग

    या प्रभागात विजयनगर, नढेनगर, पवनानगर, ज्योतिबानगर, आदर्शनगर, कोकणे नगर आणि राजवाडे नगर या महत्त्वाच्या वस्त्यांचा समावेश होतो.

    ३. ग्राऊंड रिपोर्ट: “सुविधांची वानवा, नागरिकांचा वाढता रोष”

    पॉलिटिकल वझीरच्या रिपोर्टनुसार, या प्रभागातील प्रमुख प्रश्न खालीलप्रमाणे आहेत

    रखडलेली आरक्षणे: प्रभागात महापालिकेचे सुसज्ज रुग्णालय, शाळा आणि खेळाच्या मैदानासाठी जागा आरक्षित आहेत, मात्र अद्याप त्यांचा विकास झालेला नाही. काही ठिकाणी तर झालेली आरक्षणे रद्द झाल्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे.

    अतिक्रमण आणि वाहतूक कोंडी: काळेवाडी परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली आहेत. भाजी मंडईसाठी जागा नसल्याने विक्रेते रस्त्यावरच बसतात, ज्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो.
    
    पाणी आणि ड्रेनेज समस्या: परिसरात अनियमित आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. पावसाळी गटारांची व्यवस्था नसल्याने पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचते.
    
    सुरक्षेचा प्रश्न: वाढती गुन्हेगारी रोखणे हे या भागातील मोठे आव्हान आहे. तसेच शाळांच्या परिसरात अनधिकृत टपऱ्यांमुळे विद्यार्थ्यांवर चुकीचे संस्कार होण्याची भीती पालकांकडून व्यक्त केली जात आहे.

    ४. विकासाचा आढावा: प्रभाग २२

    मार्गी लागलेली कामे

    • आदर्शनगर येथे महापालिकेच्या मराठी शाळेची नवीन इमारत.
    • तावडे नगर ते पवना नदीपर्यंत सांडपाणी वाहिनीचे काम पूर्ण.
    • ज्योतिबा उद्यान आणि स्मशानभूमीचे नूतनीकरण.

    रखडलेली कामे

    • रहाटणी ते नदी किनारी बीआरटी रस्त्याला जोडणारा १८ मीटर रस्ता.
    • ज्योतिबानगर येथील भाजी मंडई आणि क्रीडांगणाचा विकास.
    • तापकीर मळा ते काळेवाडी मुख्य चौक दरम्यानचा १२ मीटर रुंद डीपी रस्ता.

    ५. विश्लेषण: प्रभाग २२

    बळ:- मध्यमवर्गीय आणि सुशिक्षित मतदारांची मोठी लोकसंख्या.

    उणिवा:- सार्वजनिक आरोग्य केंद्र आणि भाजी मंडईसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव.

    संधी: – रखडलेले रस्ते आणि आरक्षित जागांचा ताबा मिळवून विकास केल्यास कोणत्याही नेत्याला मोठी संधी आहे.

    धोका:- वाढती गुन्हेगारी आणि वाहतुकीचा गोंधळ यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होऊ शकतो.

    पॉलिटिकल वझीरच्या सूचना:-

    प्रभाग २२ मध्ये निवडणुकीचे वारे फिरवण्यासाठी केवळ रस्त्यांच्या गप्पा मारून चालणार नाही. जो उमेदवार काळेवाडीतील आरक्षित जागांचा विकास आणि वाहतूक कोंडीमुक्त काळेवाडी हे मुद्दे प्रकर्षाने मांडेल, त्यालाच जनता आपला प्रतिनिधी म्हणून निवडून देईल.

  • प्रभाग २० मध्ये विकासाचा ‘पाऊस’ की समस्यांचा ‘पूर’?

    पिंपरी-चिंचवड शहराच्या केंद्रस्थानी असलेला आणि महत्त्वाची शासकीय कार्यालये, रुग्णालये व एस.टी. आगाराने वेढलेला प्रभाग क्रमांक २० सध्या एका विचित्र द्वंद्वात अडकला आहे. एका बाजूला कासारवाडीतील चकचकीत शाळा आणि उड्डाणपूल आहेत, तर दुसऱ्या बाजूला संत तुकाराम नगरमधील तुंबलेले सांडपाणी नागरिकांच्या संयमाची परीक्षा घेत आहे.

    १ ग्राउंड रिअॅलिटी: ‘साचलेल्या’ प्रश्नांचा निचरा कधी?:-

    या प्रभागाची भौगोलिक रचना आणि नागरी समस्या पाहता, मतदारांमध्ये काही मुद्द्यांवर तीव्र नाराजी दिसून येते.

    सांडपाणी आणि पावसाचे पाणी: संत तुकाराम नगर परिसरात पावसाळ्यात सांडपाणी वाहून नेणारी यंत्रणा कोलमडते, ज्यामुळे अनेक सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये आणि घरांमध्ये पाणी शिरते.

    पाणी आणि वीज पुरवठा: “वेळेवर कर भरूनही कमी दाबाने आणि अशुद्ध पाणीपुरवठा का?” असा प्रश्न गृहिणी विचारत आहेत. सोबतीला वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा ही एक मोठी डोकेदुखी ठरली आहे.

    वाहतुकीची ‘कोंडी’ आणि बेशिस्त पार्किंग: वल्लभनगर एस.टी. आगार आणि डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयासमोर वाहने बेशिस्तपणे उभी केली जातात, ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकांनाही वाट मिळणे कठीण होते.

    रखडलेले पुतळे आणि रस्ते: वल्लभनगर ते महेश नगर चौकातील सिमेंट रस्ता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्याचे काम वर्षानुवर्षे प्रलंबित आहे.

    २} प्रभाग २०: सविस्तर विश्लेषण:-

    बलस्थाने:- शिक्षण आणि आरोग्य: कासारवाडीत अत्याधुनिक मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि क्रीडा संकुलांची निर्मिती.
    प्रशासकीय केंद्र: महापालिका भवन, वायसीएम रुग्णालय आणि एस.टी. आगाराची जवळीक.

    उणिवा:- सांडपाणी व्यवस्थापन: जुन्या ड्रेनेज लाईन आणि पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी सक्षम यंत्रणेचा अभाव.

    रखडलेली प्रशासकीय कामे: प्रभागाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे काम अद्याप प्रलंबित.

    संधी:- SRA प्रकल्पांना गती: महात्मा फुले नगरमधील झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम पूर्ण केल्यास मोठ्या मतपेढीवर पकड मिळवता येईल.

    स्मार्ट पार्किंग: एस.टी. आगाराजवळ सुसज्ज पार्किंग इमारत उभारून वाहतूक कोंडी सोडवण्याची संधी.

    धोके;- भटकी कुत्री: परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याने शाळकरी मुले आणि ज्येष्ठांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

    बेशिस्त पार्किंग: रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे होणारे अपघात आणि नागरिकांचा वाढता असंतोष.

    ३} मतदारांची आकडेवारी:-

    एकूण मतदार: ४५,९२१

    पुरुष: २३,९९७ | महिला: २१,९२०

    आरक्षण: ३२ ‘अ’ (अ.जा. राखीव), ३२ ‘ब’ (ओबीसी महिला), ३२ ‘क’ (महिला राखीव), ३२ ‘ड’ (सर्वसाधारण)

    ४} जनतेचा आवाज:-

    • पावसाळ्यात दरवर्षी घरांमध्ये घाण पाणी शिरते, आमचे आर्थिक नुकसान होते, यावर कायमस्वरूपी उपाय हवा.
    • भटकी कुत्री आणि बेशिस्त पार्किंगमुळे परिसरात चालणेही कठीण झाले आहे.
    • सांडपाणी वाहिन्यांच्या दुरवस्थेमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

    ‘पॉलिटिकल वझीर’चा निष्कर्ष:

    प्रभाग २० मधील राजकारण हे केवळ सिमेंटचे रस्ते किंवा ‘ब्युटीफिकेशन’ वर चालणार नाही. येथील नागरिक सुशिक्षित आणि जागरूक आहेत. त्यांच्यासाठी पाण्याचा निचरा हा केवळ तांत्रिक प्रश्न नसून तो त्यांच्या ‘जीवनमानाच्या दर्जाचा’ प्रश्न आहे.
    या प्रभागाचा सत्ताधीश तोच ठरेल जो ‘स्मार्ट सिटी’च्या वल्गना करण्याऐवजी, प्रत्यक्षात जमिनीवर उतरून पाणी, वीज आणि पार्किंग या त्रिसूत्रीवर तोडगा काढेल. यंदा प्रभाग २० मध्ये हवेतील विकासापेक्षा जमिनीवरचा हक्काचा नगरसेवक निवडण्याकडे मतदारांचा कल असेल!

  • पिंपरीची ‘आर्थिक वाहिनी’ समस्यांच्या कोंडीत; प्रभाग १९ मध्ये विकासाचा समतोल हरवला?

    पिंपरी-चिंचवड शहराच्या सामाजिक आणि आर्थिक नकाशावर केंद्रस्थानी असलेला प्रभाग १९ सध्या अनेक आव्हानांचा सामना करत आहे. पिंपरी आणि चिंचवडला जोडणाऱ्या लिंक रोडवरील हा भाग कामगार वस्त्या, जुनी बाजारपेठ आणि उच्चभ्रू सोसायट्यांचा एक अनोखा संगम आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळलेले प्रश्न आता निवडणुकीच्या तोंडावर ऐरणीवर आले आहेत.

    १. पॉलिटिकल वझीर ग्राऊंड रिपोर्ट: ज्वलंत समस्या:-

    प्रभागाचा विस्तार मोठा असला, तरी काही भागांत विकासाची गती समाधानकारक नाही:

    पुनर्वसन आणि आरक्षण: भाटनगर आणि चिंचवड स्टेशन येथील आनंदनगर झोपडपट्टीचे पुनर्वसन, तसेच उद्यानांसाठी राखलेली आरक्षणे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत.

    वाहतूक कोंडी आणि वाहनतळ: शहराची मुख्य बाजारपेठ असूनही या भागात सुसज्ज वाहनतळ नाही. पिंपरी कॅम्प आणि मुख्य चौकात होणारी वाहतूक कोंडी व्यापाऱ्यांसाठी आणि ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

    स्वच्छतागृहांचा अभाव: खरेदीसाठी येणाऱ्या महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांची मोठी कमतरता आहे.

    पाणीपुरवठा: सोसायट्यांमध्ये पाण्याची समस्या गंभीर असून, दिवसाआड आणि कमी दाबाने पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत.

    २. मार्गी लागलेली कामे :-

    काही आघाड्यांवर प्रशासनाला यश आले आहे:

    पायाभूत सुविधा: फुल मार्केट, चिंचवडमधील उद्याने आणि एम्पायर इस्टेट उड्डाणपुलाला जोडणारे रस्ते पूर्ण झाले आहेत.


    गृहप्रकल्प: भाटनगर येथे जेएनएनयूआरएम च्या माध्यमातून घरकुल योजना राबवण्यात आली आहे.

    ३. प्रभाग १९ विश्लेषण:-

    संधी:- बाजारपेठेचे आधुनिकीकरण: पिंपरी कॅम्पमधील भाजी मंडईचे योग्य नियोजन केल्यास आणि वाहनतळ उभारल्यास स्थानिक व्यापाराला मोठी चालना मिळेल. .
    विरंगुळा केंद्र: ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र आणि उद्याने विकसित करण्याची मोठी संधी येथे आहे.

    धोके:-नागरिकांचा संताप: मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या भागातील मतदार यावेळी ‘परिवर्तनाचा’ पवित्रा घेऊ शकतात.
    सुरक्षेचा प्रश्न: अरुंद रस्ते आणि बेशिस्त पार्किंगमुळे अपघात होण्याचा धोका वाढला आहे.

    ४. प्रभागातील समीकरणे आणि लोकसंख्या:-

    या प्रभागात विजयनगर, उद्योगनगर, सुदर्शननगर, श्रीधरनगर, आनंदनगर, भोईर कॉलनी, गावडे पार्क, भीम नगर, सम्राट अशोकनगर, भाटनगर, भाजी मंडई आणि पिंपरी कॅम्प यांचा समावेश होतो.

    एकूण मतदारसंख्या: ५६,३०७.

    पुरुष मतदार: २९,०५७ | स्त्री मतदार: २७,२४७.

    आरक्षण: ३२ अ- अनुसूचित जाती महिला, ३२ ब- ओबीसी, ३२ क- खुला गट महिला, ३२ ड- खुला गट.

    ५. जनतेचा कौल: काय म्हणतात रहिवासी?

    • घनश्याम चौधरी (व्यापारी): बाजारपेठ असूनही वाहनतळ नाही, वाहतूक कोंडीमुळे मुलांना बाहेर पाठवायला भीती वाटते.
    • श्रेया पडगिलवार (रहिवासी): महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे नाहीत, उद्यानांसाठी आम्हाला लांब जावे लागते.
    • समाधान गायकवाड (नागरिक): काही भागाचा कायापालट झाला, पण काही भाग आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे.
    • आनंद शुक्ला (गावडे पार्क): सोसायट्यांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, वारंवार विनंती करूनही दखल घेतली जात नाही.

    निष्कर्ष:

    प्रभाग १९ मधील जनता आता केवळ बाजारपेठेचे केंद्र या ओळखीवर समाधानी नाही. जो उमेदवार पार्किंगची समस्या, पाणीपुरवठा आणि झोपडपट्टी पुनर्वसन या त्रिसूत्रीवर काम करेल, तोच यावेळेस विजयाचा खरा मानकरी ठरेल.


  • चिंचवड तीर्थक्षेत्राला अंतर्गत रस्ते आणि प्रदूषणाचा विळखा; विकासाची गाडी ‘बटरफ्लाय’ पुलावरच अडकली?

    पिंपरी-चिंचवडमधील प्रभाग १८ हा ऐतिहासिक मोरया गोसावी मंदिर आणि क्रांतीवीर चापेकर बंधूंच्या वारशाने पुनीत झालेला भाग आहे. मात्र, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या भागात नागरी समस्यांचा डोंगर उभा असून, गावठाणातील अरुंद रस्ते आणि पवना नदीच्या प्रदूषणाने नागरिक मेटाकुटीला आले आहेत.

    १. पॉलिटिकल वझीरचा मते : मतदारांची आकडेवारी:-

    एकूण मतदार: ५४,८९२.

    मतदार विभागणी: २७,८७८ पुरुष आणि २७,०१२ महिला मतदार.

    प्रभागाचे आरक्षण: १८-अ (मागास प्रवर्ग महिला राखीव), १८-ब (महिला राखीव), १८-क (खुला) आणि १८-ड (खुला)

    २. या प्रभागामधील प्रमुख भाग:-

    या प्रभागात चिंचवड गावठाण, केशव नगर, तानाजी नगर, एस के एफ कॉलनी, रस्टन कॉलनी, पवनानगर, वेताळनगर, काकडे पार्क आणि मोरया राज पार्क या महत्त्वाच्या भागांचा समावेश होतो.

    ३. ग्राऊंड रिपोर्ट: “रस्ते अरुंद, कोंडी प्रचंड!”

    पॉलिटिकल वझीरच्या रिपोर्टनुसार, या प्रभागातील सर्वात ज्वलंत समस्या खालीलप्रमाणे आहेत:

    वाहतूक कोंडी: गांधी पेठ, चापेकर चौक आणि मुख्य बाजारपेठेत सणासुदीच्या काळात पाय ठेवायलाही जागा उरत नाही. गावठाणातील अंतर्गत रस्ते अत्यंत अरुंद असून पदपथांवर अनधिकृत वाहने उभी केल्यामुळे पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होते.

    पवना नदी प्रदूषण: शहराची जीवनवाहिनी असलेल्या पवना नदीत थेट सांडपाणी आणि कंपन्यांचे रसायने सोडली जात असल्याने नदी प्रदूषित झाली आहे. थेरगावच्या बाजूने पाणी अडवले जात असल्याने नदीत वारंवार फेस तयार होत असून परिसरात दुर्गंधी पसरते.

    अपूर्ण विकासकामे: चिंचवडच्या बाजूने बटरफ्लाय पुलाचे जोड रस्ते अद्याप प्रलंबित आहेत. पुलावरून गावठाणात शिरताना रस्ते अचानक अरुंद होतात, ज्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.

    मैदानांचा अभाव: चिंचवडगाव परिसरात खेळाच्या मैदानांची कमतरता असून, झोपडपट्टी पुनर्वसनाचे अनेक प्रकल्प अद्याप रखडलेले आहेत.

    ४. विकासाचा आढावा: प्रभाग १८

    मार्गी लागलेली कामे:-

    • चिंचवड ते थेरगाव जोडणाऱ्या ‘बटरफ्लाय’ पुलाचे काम पूर्ण.
    • गावठाणातील काही रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण.
    • नदी लगतच्या भागात गार्डनच्या कामाला सुरुवात.

    रखडलेली कामे:-

    • पुलाच्या बाजूचे जोड रस्ते आणि सायकल ट्रॅकचे काम अपूर्ण.
    • पवना नदी प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांची प्रतीक्षा.
    • बाजारपेठेत बहुमजली पार्किंग आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांची निर्मिती.

    ५. विश्लेषण प्रभाग १८:-

    (बळ): मोरया गोसावी मंदिरामुळे असलेले धार्मिक महत्त्व आणि मोठी बाजारपेठ.

    (उणिवा): नियोजनाचा अभाव असलेला अरुंद रस्ते आणि वाहतुकीचा विळखा.

    (संधी): तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी सुसज्ज पार्किंग आणि नदी सुधार प्रकल्प राबवल्यास नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळेल.

    (धोका): नदी प्रदूषणामुळे पसरणारे आजार आणि वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांची कमी होणारी संख्या

    पॉलिटिकल वझीरचं संकेत:-

    प्रभाग १८ मध्ये निवडून येण्यासाठी केवळ ‘तीर्थक्षेत्र’ म्हणून गौरव करून चालणार नाही. जो उमेदवार पवना नदीची स्वच्छता आणि बाजारपेठेतील वाहतूक कोंडी यावर कायमस्वरूपी तांत्रिक तोडगा काढेल, चिंचवडची जनता त्यालाच आपला मंत्री निवडेल.

  • वाल्हेकरवाडीला विकासाचे केवळ ‘गाजर’; ३० वर्षांनंतरही अनधिकृत घरांचा मुद्दा तापलेलाच!

    पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत १९९७ साली समावेश होऊनही वाल्हेकरवाडी (प्रभाग १७) हा भाग भौगोलिक आणि राजकीयदृष्ट्या आजही दुर्लक्षित राहिला आहे. सामान्य कामगारांना राहण्यासाठी शहरात प्रथम प्राधान्य असलेला हा परिसर असूनही येथील नागरिकांना आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे.

    १. पॉलिटिकल वझीरच्या मते मतदारांची आकडेवारी:-

    एकूण मतदार: ५६,५२३
    
    मतदार विभागणी: २९,७४९ पुरुष आणि २६,७५९ महिला मतदार.
    
    प्रभागाचे आरक्षण: १७-अ (अनुसूचित जाती महिला), १७-ब (ओबीसी), १७-क (महिला) आणि १७-ड (सर्वसाधारण खुला गट).

    २. ‘बॅटल ग्राऊंड’ मधील प्रमुख भाग:-

    या प्रभागात वाल्हेकरवाडी गावठाण, चिंतामणी चौक (काही भाग), भोंडवे वस्ती, चिंचवडे नगर, बिजलीनगर, गिरीराज सोसायटी परिसर, प्रेमलोक पार्क आणि दळवी नगर या भागांचा समावेश होतो.

    ३. ग्राऊंड रिपोर्ट: प्रश्नांचा ‘पाऊस’ आणि आश्वासनांचा ‘पूर’:-

    पॉलिटिकल वझीरच्या ग्राऊंड रिपोर्टनुसार येथील रहिवाशांच्या मुख्य समस्या खालीलप्रमाणे आहेत:

    अनधिकृत घरांचा प्रश्न: नवनगर विकास प्राधिकरण बाधित अनधिकृत घरे अधिकृत करण्याचे आश्वासन केवळ निवडणुकांपुरतेच दिले जाते. नियम शिथिल करून ही घरे अधिकृत करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

    पाणी आणि आरोग्याची हेळसांड: परिसरात अनेक ठिकाणी कमी दाबाने आणि गढूळ पाण्याचा पुरवठा होतो. तसेच आरोग्य उपकेंद्रात पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत.

    वाहतूक कोंडी आणि भाजी मंडई: वाल्हेकरवाडी परिसरात भाजी मंडई नसल्याने विक्रेते रस्त्यावरच बसतात, ज्यामुळे सकाळ-संध्याकाळ मोठी वाहतूक कोंडी होते.

    स्मशानभूमीचा अभाव: जवळपास ३० वर्षे होऊनही या भागात स्वतंत्र स्मशानभूमी उपलब्ध नाही, ज्यामुळे अंत्यविधीसाठी नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.

    रखडलेले पूल आणि रस्ते: बिजलीनगर स्पाइन रस्त्यावरील डेअरी फार्मला जोडणारा पूल अनेक वर्षांपासून ‘जैसे-थे’ आहे.

    ४. विकासाचा आढावा: प्रभाग १७:-

    मार्गी लागलेली कामे:

    • चिंचवड जुना जकात नाका ते रावेत हद्दीपर्यंत अर्बन स्ट्रीट योजनेचे काम. .
    • गुरुद्वारा चौक परिसराला जोडणाऱ्या सबवेचे काम.
    • चिंचवड पोलीस स्थानकाचे अंकित चिंतामणी चौकातील पोलीस चौकी.

    रखडलेली कामे:-

    • बिजलीनगर ते रावेत जोडणारा रेल्वे पूल आणि २४ मीटर डीपी रस्ता.
    • वाल्हेकरवाडी गावठाण आणि भोंडवे वस्तीतील रस्त्यांची समस्या.
    • ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र, आरोग्य केंद्र आणि सांडपाणी निचरा व्यवस्था.

    ५. विश्लेषण: प्रभाग १७:-

    बळ: मध्यमवर्गीय आणि कामगार वर्गाची मोठी लोकसंख्या जी प्रभागाचा चेहरा बदलू शकते.

    उणिवा: स्मशानभूमी, क्रीडांगण आणि उद्यानांचा अभाव; मूलभूत नागरी सुविधांची कमतरता.

    संधी: अनधिकृत घरांचा प्रश्न मार्गी लावणारा आणि पवना नदी सुधार प्रकल्पांतर्गत प्रदूषण थांबवणारा नेता मतदारांचा विश्वास जिंकेल.

    धोका: नदीकाठच्या घरांना असलेला पुराचा धोका आणि वाढत्या डबक्यांमुळे होणारे आरोग्याचे नुकसान.

    पॉलिटिकल वझीरचे संकेत:-

    प्रभाग १७ मध्ये निवडणुका जिंकायच्या असतील, तर केवळ रस्त्यांचे डांबरीकरण करून चालणार नाही. जो उमेदवार अनधिकृत घरांच्या टांगत्या तलवारीतून नागरिकांना मुक्त करेल आणि वाल्हेकरवाडीला हक्काची स्मशानभूमी व उद्यान मिळवून देईल, तोच खरा वझीर ठरेल.